नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – भारतीय संघाच्या कर्णधारपदाची पूर्णवेळ जबाबदारी मिळाल्यास ती सांभाळण्यास सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा यांने दिली आहे. आशिय चषकासाठी झालेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशचा ३ गडी राखून भारताने विजय मिळवला. त्यानंतर पत्रकारांनी रोहितला भविष्यात संघाचे पूर्णवेळ नेतृत्व करणार का? असा प्रश्न केला असता, त्याने ‘नक्कीच! जेव्हा-केव्हा तशी संधी मिळेल, तेव्हा मी आनंदाने कर्णधारपद स्वीकारेन,’ असे तो म्हणाला.
संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला अति क्रिकेटमुळे आशिया चषकात विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या गैरहजेरीत संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. रोहित शर्माने आशिया चषक जिंकून आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला आहे. रोहित शर्माने या विजयाचे श्रेय संपूर्ण भारतीय संघाला दिले आहे.
संपूर्ण मालिकेत आम्ही सर्वोत्तम खेळ केला आहे, त्यामुळे हे विजेतेपद आम्ही केलेल्या मेहनतीला मिळालेले फळ आहे. ज्या पद्धतीने अखेरच्या षटकात फलंदाजांनी दबावाचा सामना करत संघाला विजय मिळवून दिला ही गोष्ट वाखणण्याजोगी आहे. अखेरच्या १० षटकांमध्ये आमच्यावर दबाव टाकण्यात बांगलादेशचा संघही यशस्वी झाला, त्यामुळे ते देखील कौतुकास पात्र आहेत, असे रोहित म्हणाला.