उरण, दि. २१ (पीसीबी) – रायगडच्या उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरातून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तब्बल १७२५ कोटींचं २२ टन हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. एका कंटेनमधून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक केली होती. चौकशीत या दोघांना अनेक खुलासे केले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी १२०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते. त्यांची अजून चौकशी करण्यात आली असता, मुंबईच्या बंदरावरही एक कंटेनर असल्याचं समोर आलं होतं.
याच माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांचं विशेष पथक दोन्ही आरोपींना घेऊन न्हावाशेवा बंदरावर दाखल झाले आणि कारवाई करत तब्बल २२ टन हेरॉइन जप्त केलं. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. याची किंमत एकूण १८०० कोटी आहे.
दिल्ली पोलीस खात्यातील डीसीपी प्रमोद कुशवाहा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या पथकात एसीपी ललित मोहन नेगी, ह्दय भूषण आणि पोलीस निरीक्षक विनोद बडोला आहेत. या पथकाने २०२०-२१ मध्ये सर्वात जास्त कारवाया करत अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यामधील अनेक प्रकरणं नार्को टेररशी संबंधित असून, रायगडमधील प्रकरणाचाही समावेश आहेत.












































