अमरनाथ यात्रा ढगफुटीत ४० यात्रेकरु बेपत्ता, लोणावळा, पिंपरी चिंचवडच्या यात्रेकरुंचा समावेश

1 Min Read

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) : अमरनाथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. एनडीआरएफचे (NDRF) महासंचालक अतुल करवाल यांनी माहिती देताना सांगितलं आहे की, या दुर्घटनेत आतापर्यंत ४० जण बेपत्ता आहेत, १५ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. NDRF पथकाकडून बेपत्ता यात्रेकरुंचा शोध सुरु आहे. बहुसंख्य यात्रेकरु हे पिंपरी चिंचवड , लोणावळा परिसरातील असल्याचे सांगण्यात येते.

घटनास्थळी एनडीआरएफचे, एसडीआरएफ (SDRF) आणि बचाव पथकाच्या तुकड्या तैनात असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळे पूर आला आणि पुराच्या तडाख्यात अनेक तंबू वाहून गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आयटीबीपी पीआरओ (ITBP PRO) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परिसरात पाऊस सुरुच आहे. वाढलेला धोका पाहता तूर्तास अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. हवामान आणि परिस्थिती सामान्य राहिल्यास यात्रा पुन्हा सुरु करण्यात येईल. जखमी लोकांना उपचारासाठी एअरलिफ्ट केलं जातं आहे.

Share This Article