दहावीला इंग्रजीला 35, विज्ञानला 38, गणितात 36 तरीही झाले IAS

0
592

देश, दि.१३ (पीसीबी) – इंटरनेटवर एका आयएएस अधिकाऱ्याचे ट्विट सध्या खूप चर्चेत आहे. वास्तविक, आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘भरूचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांनी त्यांची 10 वीची मार्कशीट शेअर करताना लिहिले आहे की, त्यांना दहावीमध्ये फक्त उत्तीर्ण गुण मिळाले आहेत. त्याच्या 100 पैकी इंग्रजीत 35, गणितात 36 आणि विज्ञानात 38 गुण मिळाले. संपूर्ण गावातच नाही तर त्या शाळेतही तो काहीच करू शकत नाहीत असे सांगण्यात आले.

दहावीच्या मार्कांवरून, भविष्यात तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी, हे अजिबात ठरवता येत नाही. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांच्या या ट्विटला भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांनी रिट्विट करत ‘धन्यवाद सर’ असे लिहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भरुचमध्ये उत्कर्ष पहल अभियानांतर्गत तुषार यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

आयएएस अवनीश शरण यांच्या या ट्विटवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टला 12.5 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर 2200 हून अधिक लोकांनी या पोस्टला रिट्विट केलं आहे. एका युजरने म्हटले की, ‘पदवी नाही, प्रतिभा महत्त्वाची असते.’ त्याचवेळी, आणखी एका यूजरने लिहिले की, ‘क्षमता मार्क, ग्रेड किंवा रँक ठरवत नाही.’ दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, ‘तुमच्यात चिकाटी असेल तर काहीही अशक्य नाही.’