या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा – सुलभा उबाळे
पिंपरी, दि. ९ -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने तीन वर्षांपूर्वी उद्घाटन झालेला
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मोशी कचरा डेपो येथे वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने १३५० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. येथे उभारण्यात आलेली कार्यालयीन इमारत नियमानुसार उभारली आहे का याची चौकशी केली पाहिजे. यामध्ये जे अधिकारी दोषी असतील तसेच तसेच सुरक्षा नियमांमध्ये हलगर्जी करणारे ठेकेदार असतील यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
गुरुवारी दुपारी खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना खा. श्रीरंग बारणे पुढे म्हणाले की, घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. येथे काम करणारे सर्व कर्मचारी हे गरीब कुटुंबातील आहेत. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या कामगाराच्या कुटुंबातील एका सदस्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी मिळावी. तसेच या घटनेची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कडक कारवाई करावी.
ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे यांनी सांगितले की, या दुर्दैवी घटनेची स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी शिवसेनेची आहे. कचरा संकलन बाबत केंद्र सरकारचे कडक नियम आहेत. यामध्ये कचऱ्याच्या डोंगराची उंची जास्तीत जास्त २० मीटर ठेवता येते. परंतु या ठिकाणी ३० मीटर पेक्षा जास्त कचऱ्याच्या डोंगराची उंची झाली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी या नियमाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांना कामापेक्षा निविदा काढण्यात जास्त आवड आहे. या घटनेची पूर्ण जबाबदारी विभाग प्रमुख यांच्यावर असून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे. हा कचरा डेपो म्हणजे पैसे खाण्याचे कुरण झाले आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळेलच. परंतु त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी दिली जावी. तसेच संजय कुलकर्णी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर योगेश आल्हाट यांना बडतर्फ करावे आणि कंपनीच्या बँक खात्यांची चौकशी केली तर यातील भ्रष्ट अधिकारी यांची नावे बाहेर येतील असे सुलभा उबाळे यांनी केली.
शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांनी सांगितले की, घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. प्रशासनाने कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली असल्याची दिसते. प्रशासन आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांचा हा बेजबाबदारपणा आहे. या कचऱ्याचे व्यवस्थापन करताना त्यांनी लक्ष दिले नाही. या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कडक कारवाई करावी अशी मागणी विश्वजीत बारणे यांनी यावेळी केली.

