महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : शत्रुघ्न काटे

2 Min Read

“विकसित महाराष्ट्र २०४७” चे ध्येय्य दृष्टिक्षेपात..!

पिंपरी, दि. ७ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पाचे स्वागत करत भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा आणि सर्व घटकांसाठी आशादायी असल्याची प्रतिक्रिया दिली.

भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प “विकसित महाराष्ट्र २०४७” या ध्येयाकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन, तसेच महिला शेतकऱ्यांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

तसेच, औद्योगिक विकासासाठी प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक समूह उभारण्याचा संकल्प, गडचिरोली येथे स्टील हब, तसेच अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई आणि वाढवण येथे चौथी मुंबई उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांसाठी भुयारी व उन्नत मार्ग, तसेच मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील स्थानकांचे काम प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू ठेवणे, दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्रे, प्रशासनात AI चा वापर आणि मोठ्या प्रमाणावर पदभरती यांसारखे निर्णयही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेला हा अर्थसंकल्प शेतकरी, उद्योग, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाचा रोडमॅप आहे. पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यालाही या महत्वाकांक्षी अर्थसंकल्पाचा फायदा होणार आहे, एकंदरीतच महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणारा हा अर्थसंकल्प ठरेल, याची खात्री आहे.”

Share This Article