हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेत बंजारा समाजाची बैठक

2 Min Read

पिंपरी, दि.१५ : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने संत सेवालाल जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने बंजारा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व समाजघटकांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आले.

बैठकीला उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, उप अभियंता संजय जाधव यांच्यासह नितीन चव्हाण, रावसाहेब राठोड, रमेश राठोड, अविनाश राठोड, रवि राठोड, रोहित चव्हाण, किशोर चव्हाण, सुभाष चव्हाण, रघुनाथ चव्हाण, कार्तिक पवार, अमोल पवार, बालाजी राठोड, दिलीप आडे यांच्यासह बंजारा समाजातील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

उपायुक्त अण्णा बोदडे यांनी बैठकीत बोलताना ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महापालिकेकडून या कार्यक्रमाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. युवक व महिलांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासोबतच नियोजनबद्ध पद्धतीने उपस्थिती वाढविण्यासाठी स्थानिक स्तरावर बैठका व संपर्क अभियान राबवले जात आहे, असेही ते म्हणाले.

विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात्मक बाबींविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शहरातून खारघर येथे जाणाऱ्या नागरिकांच्या समन्वयासाठी आवश्यक नियोजन, माहिती प्रसार, सोशल मीडियाद्वारे जनजागृती तसेच विविध समाजघटकांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. ‘हिंद-दी-चादर’ हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव वृद्धिंगत करणारा उपक्रम आहे, असे देखील ते म्हणाले.

बैठकीत बंजारा समाजाच्या प्रतिनिधींनीही कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. पिंपरी चिंचवड शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविण्यासाठी महापालिका व समाज प्रतिनिधी समन्वयाने कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share This Article