देशातील शिक्षण आणि आरोग्य आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

2 Min Read

दि. ११ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी इंदूर येथील एका कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राच्या सद्यस्थितीवर थेट भाष्य करताना घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले की, देशातील महागडे शिक्षण आणि आरोग्य सुविधा आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पूर्वी ही क्षेत्रे सेवेचे साधन मानली जात होती, परंतु आता त्यांचे पूर्णपणे व्यापारीकरण झाले आहे.

सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर शिक्षण
भागवत म्हणाले की, ‘ज्ञानाच्या युगात शिक्षण खूप महत्वाचे आहे, यासाठी माणूस आपले घर विकेल, परंतु तो आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे, आरोग्यासाठी देखील माणूस आपली संपूर्ण बचत गुंतवण्यास तयार असतो जेणेकरून त्याला चांगल्या ठिकाणी उपचार मिळतील. ते म्हणाले की, समाजात सर्वात जास्त गरज असलेली गोष्ट म्हणजे शिक्षण आणि आरोग्य, परंतु दुर्दैवाने आज या दोन्ही सुविधा स्वस्त नाहीत आणि सहज उपलब्ध नाहीत. भागवत पुढे म्हणाले की, शाळा आणि रुग्णालये वाढत नाहीत असे म्हणता येणार नाही, उलट त्यांची संख्या सतत वाढत आहे, परंतु विचार केला तर असे दिसून येते की हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जातात. कारण पूर्वी शिक्षण आणि आरोग्य हे सेवाकार्य मानले जात होते, आता त्याला व्यवसायाचे स्वरूप देण्यात आले आहे. शिक्षण आणि आरोग्य हे व्यवसाय बनले की ते सामान्य माणसाच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडे जातात याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

भागवत म्हणाले की, त्यांनी अलिकडेच एक अहवाल वाचला होता ज्यामध्ये म्हटले होते की भारताची शिक्षण व्यवस्था आता ‘ट्रिलियन डॉलर्स’चा व्यवसाय बनली आहे. ते म्हणाले की, जेव्हा एखादा क्षेत्र इतका मोठा व्यवसाय बनतो तेव्हा तो आपोआप सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जातो. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांनी भागवत यांचे विधान शिक्षण आणि आरोग्य सुधारणांकडे एक महत्त्वाचा संदेश म्हणून पाहिले. त्यांचे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा देशभरात खासगी शाळा आणि रुग्णालयांच्या वाढत्या फी आणि उपचारांच्या महागड्या खर्चावर चर्चा सुरू आहे.

Share This Article