अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हीच कष्टकऱ्यांची इच्छा : बाबा कांबळे

bpcauthor bpcauthor
2 Min Read

– विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांची भूमिका महत्त्वाची,बाबर कांबळे यांचे प्रतिपादन

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) : ज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. प्रशासनावर त्यांची मोठी पकड आहे. राज्य हिताचे निर्णय तत्काळ घेण्याची धमक आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांतर ते महत्वाची भूमिका पार पाडतील. तसेच अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा सर्व कष्टकऱ्यांची आहे, असे प्रतिपादन कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये कामगार, शेतकरी, कष्टकरी, रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम मजूर सह महाराष्ट्रातील प्रत्येक घटकांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र काम करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे अजित पवार आहेत. त्यांच्यामुळे आमचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. 23 तारखेला निवडणुकी संदर्भात निकाल येणार आहे. यामध्ये कोणाची सत्ता येणार, कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, अशा प्रकारचे तर्क वितर्क काढले जात आहेत, याबाबत, कष्टकरी जनता आघाडी वतीने नुकताच राष्ट्रवादी– भाजप – शिवसेना – आरपीआय आठवले गट या महायुतीला पाठिंबा देण्यात आला होता.

याबाबत बाबा कांबळे म्हणाले विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 4 कोटी कष्टकरी जनता व संघटित कामगारांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केले आहे. पिंपरी, चिंचवड, मावळ, भोसरी, या मतदारसंघात मी स्वतः प्रचार केला असून महाराष्ट्रात देखील आमच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन प्रचार केला आहे. महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांचे कार्य असून, सर्वसामान्य कष्टकरी जनता सर्वसामान्य नागरिक यांनी मात्र अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशा प्रकारचे अपेक्षा व्यक्त केली, असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

प्रतिक्रिया :

एक्झिट पोल सर्वे मध्ये अजितदादा पवार यांना अत्यंत कमी जागा दाखविल्या जात आहेत. मात्र पोलचा हा अंदाज २३ तारखेच्या निकालानंतर फेल गेल्याचे समजेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या कमीतकमी ४५ जागांवर यश मिळून आमदार होतील.
त्यानंतर मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे, असे वाक्य महाराष्ट्राला ऐकायला मिळेल असा विश्वास आहे.

– बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकरी जनता आघाडी.

Share This Article