जरांगे पाटलांनी उपोषण सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया…

2 Min Read

मुंबई,दि.०३(पीसीबी) – मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. या प्रक्रियेत माजी न्यायमूर्ती न्या. सुनील शुक्रे आणि न्या. मारोती गायकवाड यांनी राज्य सरकारला बहुमूल्य सहकार्य केले, मी त्यांचे विशेष आभार मानतो. माझ्या सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचेही आभार ! अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

२४ डिसेंबरनंतर सरकारला एकही दिवस वाढवून न देण्यास जरांगे पाटलांनी विरोध केलाय. सरकारच्या शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत वेळ देण्याची विनंती मनोज जरांगे यांना केली. पण जरांगे पाटील २४ डिसेंबर या तारखेवर ठाम राहिले. त्यानंतर तारखेबाबत बराच वेळ चर्चा देखील करण्यात आली. अखेर त्यांनी दोन महिन्यांची मुदत देत असल्याचं म्हटलं आहे. तसंच २ जानेवारीनंतर मुंबईचं नाक बंद करु असा इशारा दिला आहे.

सरकारकडून गेलेल्या शिष्टमंडळाला मोठं यश आलं. कारण २५ ऑक्टोबरपासून सुरु असलेलं जरांगे पाटलांचं उपोषण त्यांनी अखेर मागे घेतलं. दरम्यान त्यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत देखील यावेळी दिली. सरकारला मुदत देण्याच्या कालावधी वरुन प्रदीर्घ काळ चर्चा सुरु होती. पण जरांगे पाटील हे त्यांच्या भूमिकेवरही ठाम होते.

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात गेलं. त्यावेळी शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी ८ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचंही आश्वासन दिलं.

Share This Article