मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या मंत्र्याने कसबामध्ये ३० कोटी रूपये वाटले

2 Min Read

पुणे, दि. २८ (पीसीबी) – कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल (रविवारी) मतदान झाले. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत मतदानानंतरही वाद संपण्याचे नाव घेत नाही. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री व नेते कसबामध्ये पैसे वाटत फिरत होते, त्यांच्याकडून ३० कोटी रूपये वाटले गेल्याचा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप धंगेकरांनी केले आहेत.

धंगेकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर म्हणाले, “प्रचार संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसबा मतदारसंघात पैसे वाटत फिरत होते. त्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील मतदारसंघात फिरत होते. ही गोष्ट निवडणूक आयोगाला लक्षात आली नाही का? ही लोक पैशाचे आमिष दाखवत मतदारसंघात फिरतात. पोलीस खातं ही सोबत होतं. पोलिसांना यांच्यावर गुन्हा दाखल का करता आलं नाही? असा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

धंगेकर पुढे म्हणाले, “देशात हुकूमशाही आहे का? सर्वसामान्य लोकांनी निवडणूक लढवायची नाही? हे सगळे काय जनतेचे मालक झालेत का? चोरामाऱ्या केलेल्या कोट्यवधी रूपये आणायचे, लोकांमध्ये वाटून द्यायचं. आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला घायाळ करायचं, असं होऊ शकत नाही. जर त्यांनी माझ्यावर दावा दाखल केला, सगळे रेकॉर्ड काढून मी त्यांच्यापाशी बसेन. आणि या गोष्टी का नाही केल्या म्हणून त्यांच्यावर कारवाई करेन. निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी आहे, त्याच्यावर ही कारवाई करेन. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. तीस कोटी रूपये वाटल्यानंतरही त्यांची ही अशी परिस्थिती, असे खळबळजवक वक्तव्य धंगेकरांनी केले

Share This Article