अधिवेशनापूर्वीच मंत्रीमंडळ विस्तार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे..

2 Min Read

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) : सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले, या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. राज्याच्या विकासासाठी काही सदिच्छा भेट घेतल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

या दौऱ्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी आणि केंद्रीय मंत्री राजनाथसिंग यांच्या भेटी घेतल्या, यानंतर माध्यमांशी संवाद साधला, यादरम्यान मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही भेट सदिच्छा भेट आहे. आम्ही दोघं उद्या आषाढी एकादशी झाली की मुंबईत बसून चर्चा करू आणि तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देऊ असे त्यांनी सांगितलं. अधिवेशन हे पुढे ढकलले जाणार का यावर बोलतांना शिंदे यांनी सांगितले की, १८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्याने ते मागे-पुढे होऊ शकते. पण या अधिवेशनाच्या पुर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

पुढे बोलताना शिंदे यांनी सांगितलं की, शिवसेना-भाजप युतीचं सरकार जे अडीच वर्षींपूर्वी झालं पाहीजे होतं ते आम्ही स्थापन केलं आहे, चाळीस अधिक दहा हे ५० आमदार तीन-चार लाख लोकातून निवडून आलेले आमदार आहेत, ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक देखील एकडे तीकडे जायला दहा वेळा विचार करतो, या आमदारांना मागच्या अडिच वर्षात त्यांना अनुभव आला आहे. मुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. हे आमचं हे बंड नाही, ही गद्दारी म्हणतायत ही गद्दरी नाही, ही क्रांती आहे, अन्यायाविरोधातील उठाव आहे, हे पैशांने विकले जाणारे नाहीयेत .

हे सरकार किती दिवस टिकेल असे विचारले असता, हे सरकार अडीच वर्ष पुर्ण करेलच एवढी कामे आम्ही करू, बाकी लोकांसारखे २५ वर्ष वगैरे सांगत नाही. पण पुढची निवडणूक पण जिंकू आणि २०० आमदार निवडून आणू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

Share This Article