अग्निपथ भरती योजनेवर आज मोठा निर्णय

2 Min Read

– दुपारी दोन वाजता लष्कराच्या तिन्ही दल प्रमुखांची प्रेस
नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) : सध्या अग्निपथ भरतीच्या योजनेवरून देशभर हिंसाचार पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ होत असून अनेक तरूण रस्त्यावर उतरले आहेत. देशभरातून होत असलेला विरोध लक्षात घेता लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची आज एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुपारी दोन वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचा देशभरातून विरोध होत आहे. अनेक ठिकाणी तरूणांनी आंदोलन केले असून जाळपोळ केली आहे. यामुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बिहार आणि उत्तरप्रदेशमधून या निर्णयाला जास्त विरोध केला जात आहे. दरम्यान केरळ राजस्थानसहित अनेक राज्यांनी ही योजना रद्द करावी यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. पण सरकारने या योजनेसंदर्भात अजून काही निर्णय जाहीर केले असून त्यामध्ये तरूणांना फायदा होणार आहे असं सरकारकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान बिहामध्ये हा वाद जास्त उसळला असून पटना मध्ये सुरक्षा दलांच्या जवानांना तैनात केलं आहे. कालपर्यंत जवळपास ४६ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दानापूर येथे रेल्वेची तोडफोड केल्याच्या आरोपावरून जवळपास १७० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान देशभर उसळलेल्या या हिंसाचारामुळे बिहारमधील १२ जिल्ह्यात इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये रोहतास, लखीसराय, औरंगाबाद, कैमूर, भोजपूर, बक्सर, सारण, समस्तीपूर, बेगूसराय, नवादा, चंपारण आणि वैशाली या जिल्ह्यांचा सामावेश आहे.

Share This Article