मदुराई, दि. २६ (पीसीबी) – सध्या देशातील राजकीय परिस्थिती काहीशी विचित्र आहे. त्यामुळे २०१९ मध्ये काय होईल ? जनता कोणाला कौल देईल? कोण पंतप्रधान होईल? हे सांगता येणे कठीण आहे, असे योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदींना पाठिंबा देणारे बाबा रामदेव यांनी अचानक असे विधान केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मदुराईमध्ये एका कार्यक्रमात बाबा रामदेव बोलत होते.
यावेळी बाबा रामदेव पुढे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत मी कोणालाही पाठिंबा देणार नाही. तसेच कोणाचाही विरोध करणार नाही. भारत हिंदू राष्ट्र व्हावे, ही आमची इच्छा नाही, तर भारत अध्यात्मिक राष्ट्र व्हावे, ही आमची इच्छा आहे. मी भाजपचा प्रचार करणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
२०१९ च्या निवडणुकांच्या आधी पंतप्रधान कोण होईल, हे सांगता येणे कठीण आहे. तसेच आपण कोणालाही पाठिंबा देणार नसल्याचेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता भाजप कोणती प्रतिक्रिया देणार? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.