“१ मे पासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता पण…”

0
245

मुंबई, दि.३० (पीसीबी) : कोरोनाने अखंड जगभरात थैमान घातलं आहे. त्या पार्श्वभूमीवरती भारतात सगळीकडे लसीकरणाला सुरुवात झाली. उद्यापासून म्हणजे १ मे पासून सर्वांना लसीकरण सुरु होणार होते. परंतु, लसींचे डोस अपुरे असल्यामुळे आणि नव्या डोसचा पुरवठा देखील पुरेसा नसल्यामुळे १ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटामध्ये लसीकरण सुरू करता येणार नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे. मात्र, १ मे पासून म्हणजेच शनिवारपासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता आज बोलताना राजेश टोपे यांनी वर्तवली आहे.

शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातले सूतोवाच केले आहेत. “१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल. पण नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल, त्यांनीच संबंधित केंद्रावर जायला हवं. सुरुवातीला जिल्ह्यात एखादं केंद्र असू शकेल. त्यामुळे ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच केंद्रावर जावं. लस अतिशय नाममात्र स्वरूपात आहे”, असं राजेश टोपेंनी नमूद केलं.

“आम्ही सिरमला पत्र लिहिले होते. त्यांनी सांगितलं मे महिन्यात १३ ते १४ लाख लसीचे डोस देऊ. भारत बायोटेक कोवॅक्सिनचे ४ ते साडेचार लाख डोस देऊ शकेल. दोघांची बेरीज १८ लाखांपर्यंत जाईल. त्यादृष्टीने १८ ते ४४ वयोगटासाठी कमी केंद्रांवर लसीकरण सुरू करू शकलो, तर ते करता येऊ शकेल. पण एक नक्की आहे की केंद्र खूप कमी ठेवले, तर जास्त कालावधीसाठी लसीकरण सुरू राहील”, असंही राजेश टोपे यावेळी म्हणाले.

दरम्यान, लसीचा पुरवठा अपुरा असताना दुसरा डोस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना डोस मिळेल का? याची चिंता वाटू लागली होती. मात्र, याविषयी देखील राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. “ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे त्यांना दुसरा डोस द्यावाच लागेल. तो पूर्ण करणं गरजेचं आहे”, असं ते म्हणाले. तसेच, “लस उत्पादक कंपन्यांना ५० टक्के उत्पादन केंद्र सरकारला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आणि उरलेलं ५० टक्के राज्य सरकारं आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. खूप मागणी या दोघांकडेही आली, तर कुणाला प्राधान्य देणार? याविषयी सरकारला नियंत्रण आणावं लागेल का? असाही प्रश्न निर्माण होतो”, असं देखील त्यांनी सांगितलं.