“१० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय?”; भाजपाचा ठाकरे सरकारवर निशाणा

0
201

मुंबई, दि.२१ (पीसीबी) : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील उपनगरीय रेल्वे, रस्ते वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणली. त्यावर त्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेची सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही पारंपरिक मानसिकता बदण्याची आवश्यकता असून वेगवेगळ्या वेळांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण आखावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी निती आयोगाच्या बैठकीत केली. यावरून आता पुन्हा एकदा एका भाजपा नेत्याने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल टीका केली.

अतुल भातखळकर उद्धव ठाकरेंना टोला लगावत म्हणाले कि, “१० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय? मंत्रालयात न जाता घरी बसून राज्याचा कारभार हाकणारे (????)मुख्यमंत्री. अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी… मग दुसऱ्यांना सल्ला द्या.” निती आयोगाची सहावी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली असताना या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे सहभागी झाले होते. मुंबईत केंद्र सरकारची कार्यालये, बँका यांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी करोना निर्बंध हलके करण्यात आल्यापासून करण्यात येत आहे.