‘हे सरकार धनगर, भटक्या विमुक्तांच्या विरोधातील असून अभिमान, स्वाभिमान आणि भावनांशी खेळत आहे’

0
169

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात ढोल बांधून सभागृह परिसरात पोहोचले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं असताना गोंधळ झाल्याचं चित्र होतं. पोलिसांनी त्यांनी पाठीवर लावलेला मागण्यांचा बोर्ड काढत मोडून टाकला. इतर भाजपा नेते पोहोचले असता गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज्याच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि दरम्यान विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

यावेळी काही आरोप करत पडळकर म्हणाले कि, “हे सरकार झोपलं आहे आणि त्यासाठी धनगर समाजाचं श्रद्धास्थान असणारा ढोल वाजवून जागं करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पाठीमागे १६ मागण्या असणारा बोर्ड लिहिला होता तो मोडला आणि ढोल वाजवण्यापासून रोखलं. आमची ही लोककला आहे आणि कारण नसताना पोलिसांनी सरकारच्या सूचनेनुसार रोखलं. मी सरकारचा निषेध करतो. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत या सरकारने एकही बैठक घेतलेली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारने एक हजार कोटींपैकी पाचशे कोटींची तरतूद केली होती. त्यातला एक रुपयाही धनगर समाजाला या सरकारने दिलेला नाही. विरोधक असताना हीच लोक नागपुरात डोक्याला पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडं, हातात काठी घेऊन आंदोलन करताना दिसली. आता सत्तेत असताना हे धनगरांचा तिरस्कार करत आहेत,” असा आरोप पडळकरांनी केला.

“धनगरांच्या अभिमान, स्वाभिमान आणि भावनेशी हे सरकार खेळत आहे. या गोष्टीमुळे मंत्र्यांना गावागावत फिरणं मुश्कील होईल. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या या सरकारला आम्ही दादागिरी करु असं वाटत असेल, पण आम्ही मोडीत काढू. “हे सरकार धनगर, भटक्या विमुक्तांच्या विरोधातील आहे. महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या समूहाच्या गरजेच्या मागण्या लिहिलेला बोर्ड पोलिसांनी मोडला. सरकारचा मी निषेध करतो. विश्वासघात करुन सत्तेत आलेलं सरकार महाराष्ट्रातील गोरगरिबांशी खेळत आहे. पण हे आम्ही चालू देणार नाही. हे मुघलांचं राज्य आहे. या सरकारची दादागिरी सुरु असून मी निषेध करतो”. असं यावेळी ते म्हणाले.