“हिंदूंच्या सणांच्या वेळी जाहिरातींतून दुष्प्रचार करणार्‍यांवर हिंदूंनी आर्थिक बहिष्कार घालावा !” – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

0
245

पिंपरी, दि. 2 (पीसीबी) : सनातन हिंदु धर्मातील सर्वच सण, उत्सव आणि व्रते ही पर्यावरणपूरक, तसेच मानवासाठी हितकारक आहेत; मात्र साम्यवादी, जिहादी, मिशनरी, सिने-अभिनेते, सेक्युलर आणि नास्तिक लोक हे जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करणार्‍या चळवळी राबवतात. ‘पीके’ चित्रपटात अभिनेता आमीर खान म्हणतो की, ‘दगड (शिव पिंड) दूध पीत नाही, ते गरिबांना द्या’; पण तो ‘मृताला थंडी लागत नाही, तर मजारवर चादर कशाला ? ती गोरगरिबांना द्या’, असे का सांगत नाही ? होळी आली की, ‘पाण्याची बचत करा’, दिवाळी आली की ‘वायूप्रदूषण टाळा’, असा प्रत्येक सणांच्या वेळी प्रचार होतो. ‘पेटा’वाले म्हणतात, ‘मकर संक्रांतीला पतंग उडवू नका; कारण पतंगांमुळे पक्षी मरतात’; मात्र वर्षभर मोबाईलच्या वापरामुळे सर्वाधिक पक्षी मरतात. त्याविषयी ते का बोलत नाहीत ? हिंदूंनी संघटित होऊन या हिंदु धर्मविरोधकांच्या आक्षेपांचे सामाजिक माध्यमांवर वैचारिक खंडण करायला हवे. जाहिरातींतून दुष्प्रचार करणार्‍यांवर आर्थिक बहिष्कार टाकायला हवा. तसे केल्यास हिंदु धर्माकडे कोणी वाकड्या नजरेने पहाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदूंच्या सणांमध्ये होणारा दुष्प्रचार आणि सणांचे वैज्ञानिक महत्त्व’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

या वेळी जयपूर येथील ‘ज्ञानम् फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. दीपक गोस्वामी म्हणाले की, चित्रपटांतून हिंदु धर्माला लक्ष्य केले जात आहे. पुजारी हा बलात्कारी, तर कुख्यात गुंडाला ‘जय भवानी’ म्हणतांना दाखवले जाते. त्यामुळे हिंदू संभ्रमित होऊन धर्मापासून दूर जातो. हिंदूंना धर्माचे योग्य शिक्षण दिल्यास ते अशा अपप्रचाराला बळी पडणार नाहीत. धर्मावर आघात करणार्‍या अशा चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घालायला हवा. आपला हिंदु धर्म, संस्कृती आणि सण यांचे ज्ञान हे विज्ञानावर आधारित असल्यानेच पाश्‍चात्त्य लोक त्याचा अंगीकार करत आहेत. हे हिंदूंना लक्षात आल्यास ते अन्य पंथांकडे आकृष्ट होणार नाहीत.

या वेळी ‘लष्करे-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल म्हणाले की, जलीकट्टू, नागपंचमी आदी सण-उत्सवांच्या वेळी प्राण्यांंना इजा पोहोचवली जाते म्हणणार्‍यांना हिंदु धर्माचे खरे ज्ञान नाही. हिंदु धर्मात केवळ देवता नव्हे, तर पशु, पक्षी, निसर्ग आदी सर्वांची पूजा केली जाते. असे असतांना प्राण्यांना हानी कशी केली जाईल ? हिंदु धर्मामुळेच भारतात धर्मनिरपेक्षता आणि न्यायव्यवस्था टिकून आहे. अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी होणार्‍या हानीविषयी कोणी का बोलत नाही ? दिवाळीला फटाके फोडण्यावर बंदी घातली जाते; मात्र ‘आयपीएल्’ क्रिकेट सामन्यांच्या वेळी, तसेच आर्यन खानला सोडल्यावर फटाके फोडल्यावर कोणी आक्षेप घेतला का ? केवळ हिंदूंच्या दहीहंडी आणि श्री शबरीमला मंदिराच्या प्रथेवर आक्षेप घेतले जातात. हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने चालू आहे. हिंदूंनी त्याचा संघटित होऊन विरोध करायला हवा.