हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे ! – पायल रोहतगी

0
248

पुणे, दि. २५ (पीसीबी) -चित्रपट, वेबसिरीज यांच्या माध्यमातून हिंदुद्वेष पसरवण्याचे जाणीवपूर्वक षड्यंत्र रचले गेले आहे, जेणेकरून सनातन हिंदु धर्माच्या अनुयायांमध्ये न्यूनगंड आणि हिंदु धर्माविषयी नकारात्मकता निर्माण होईल अन् ते त्यांची ‘हिंदु’ म्हणून ओळख विसरतील. चित्रपट किंवा वेबसिरीज यांना प्रकाशझोतात आणण्यासाठीही असे प्रकार केले जातात. ज्यांना नीट अभिनयही करता येत नाही, अशांना केवळ त्यांच्या देशविरोधी आणि हिंदुविरोधी भूमिकेमुळे चित्रपटांत किंवा वेबसिरीजमध्ये काम मिळते. ही एक रणनीती आणि हिंदु धर्मावर छुप्या मार्गाने केला जाणार आघात आहे. केंद्रसरकारने बहुसंख्यांकांच्या धर्मभावनांची दखल घेऊन सामाजिक सलोख्यासाठी ईशनिंदाविरोधी कायद्यासारख्या कठोर कायदा करावा, तसेच स्वतःच्या ‘करिअर’साठी किंवा ‘फॅशन’साठी हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन अभिनेत्री पायल रोहतगी यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिन्दु राष्ट्र की’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. यू-ट्यूब, फेसबूक आणि ट्वीटर या माध्यमांतून प्रसारित झालेला हा कार्यक्रम 57 हजारांहून अधिक जणांनी पाहिला.

या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘चित्रपट, वेबसिरीज यांच्या माध्यमांतून हिंदुद्वेष पसरवणे, हा एक प्रकारचा बौद्धिक आतंकवाद आहे आणि हिंदु त्याला बळी पडत आहेत. अन्य धर्मियांनी आक्षेप घेतल्यावर ‘सॅटनिक व्हर्सेस’ ही कादंबरी आणि ‘द दा विंची कोड’ यांसारख्या चित्रपटांवर लगेच प्रतिबंध घातला जातो; पण हिंदूंनी आक्षेप घेतल्यावर अशी कारवाई होत नाही. चित्रपटाला मान्यता देण्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे; पण त्याचे सदस्य कशाच्या आधारावर चित्रपटांना मान्यता देतात, हा प्रश्‍न आहे. याविषयी जागृती करण्यासाठी मोठे आंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले, तरी त्याला मर्यादाही आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कायदेशीर साधनांचा योग्य वापर करून हिंदुद्वेषाला आळा घातला गेला पाहिजे.’’ या वेळी देवतांच्या विटंबनेच्या विरोधात कायदेशीर लढा देणारे हिंदु आय.टी. सेलचे संस्थापक श्री. रमेश सोलंकी यांनी ‘देवतांच्या विटंबनेच्या विरोधात तक्रार नोंदवून घ्यायलाही पोलीस टाळाटाळ करत असल्याचा अनुभव येतो. याविषयी हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता आहे. तुम्ही सुधारा; अन्यथा आम्ही तुम्हाला कायदेशीरदृष्ट्या सुधारू’, अशी चेतावणी त्यांनी हिंदुविरोधकांना दिली.

ईश्‍वरनिंदा विरोधी कायद्याच्या मागणीसाठी २३ जानेवारीला सोशल मीडियावर ऑनलाईन आंदोलन करण्यात आले. या वेळी ट्विटरवर #IndiaWants_BlasphemyLaw हा हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये द्वितीय स्थानावर, तर #ईशनिंदाकानूनचाहिए हा हॅशटॅग पाचव्या स्थानावर होता. याविषयी ‘ऑनलाईन पिटीशन’ही राबवण्यात येत आहे.