‘हा’ एकमेव धंदा महाराष्ट्र सरकार चांगल्याप्रकारे करत आहे – देवेंद्र फडणवीस

0
237

नागपुर,दि.०२(पीसीबी) – माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकार बदल्या करणं हा एकमेव धंदा करतंय असा आरोप त्यांनी केला आहे.

“संपूर्ण शासन फक्त बदल्यांच्या मागे लागलं आहे. बदल्या करणं हा एकमेव धंदा शासनात चालला आहे. बदल्या महत्त्वाच्या आहेत पण एखाद्या वर्षी नाही केल्या म्हणून काही फरक पडत नाही. बदल्यांचा एका वर्षाचा खर्च ५०० कोटींच्या घरात जातो. करोना संकट असताना या बदल्या केल्या नसत्या तरी चाललं असतं. पण मंत्री, प्रशासन सगळेजण कोणाला कशी पोस्टिंग मिळणार, कुठे बदली होणार यात गुंग आहेत,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान “बदल्या दरवर्षी होत असतात पण आमच्या काळात करोना नव्हता. जर आमच्या काळात करोना असता आणि बदल्या झाल्या असत्या तर बोट दाखवता आलं असतं. बदल्यांचा भत्ता देण्यासाठी ५०० कोटी लागतात. येथे पगार देण्यासाठी पैसे नाही आणि मग बदल्या कशाला सुरु आहेत?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.