नागपूर, दि. ३ (पीसीबी) – आम्ही विरोधात असताना संघर्ष तर सत्तेत आल्यावर संवाद यात्रा काढतो, निवडणुकीत मत ईव्हीएम नाही, तर मतदार देतात, आजवरच्या इतिहासात एवढा हतास, निराश आणि भरकटलेला विरोधीपक्ष पहिल्यांदाच पाहत आहे, अशी स़डकून टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली.
आगामी विधानसभा निवडणूक भाजप – शिवसेना युती करूनच लढवणार असल्याचे निश्चित आहे. जागा वाटपात आधी घटक पक्षांच्या जागा ठरवण्यात येतील, त्यानंतर शिवसेनेसोबतच्या जागाबाबत निर्णय घेतला जाईल. दोघांमधील सिटिंग जागांमधील काही जागा सोडून वाटप करू, यामध्ये आमच्या काही जागा त्यांना जातील, तर त्यांच्या काही जागा आमच्याकडे येतील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. महाजनादेश यात्रेतील नागपूर ग्रामीणमधील सभा आटोपून आल्यानंतर त्यांनी लगेच गडकरी यांची भेट घेतली.