नागपूर, दि. २६ (पीसीबी) – स्वत: मरण्यापेक्षा दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांचे कपडे काढून ठोकून काढा, असा वादग्रस्त आदेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता संताप अनावर झाला आहे. त्यामुळे स्वत: मरण्यापेक्षा ठोकून काढणेच योग्य आहे, कार्यकर्त्यांना आपण तशा सूचनाच दिल्या आहेत, असे शेट्टी यांनी येथे सांगितले.
राजू शेट्टी नागपुरात आले होते. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दौऱ्यावर आलेले मंत्री पैसा गोळा करण्याशिवाय काय करतात असा सवालही त्यांनी यावेळी केला. साखरेचे उत्पादन जास्त झाले, तरी सरकार रडत का बसत आहे, असा प्रश्न उपस्थित करत शेट्टी यांनी आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी पक्ष तीव्र आंदोलन करणार आहे, असे स्पष्ट केले.
ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन होते. त्या ठिकाणचे सर्वात जास्त चांगले कारखाने चालतात. विदर्भात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन होत नाही. त्यामुळे इकडे सर्वात जास्त ऊस कारखाने बंद किंवा तोट्यात आहेत. त्यामुळे आंदोलन आणि ऊस कारखाने चालणे याचा काही संबंध नाही. ऊस कारखाने सर्वाधिक कर आणि रोजगार देतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.