लखनौ, दि. ६ (पीसीबी) – समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला मतदान करणे म्हणजे पाकिस्तानला मतदान करण्यासारखे आहे, असे वादग्रस्त विधान भाजप नेते वरुण गांधी यांनी केले आहे. वरूण गांधी यांनी या आधीही अनेक वादग्रस्त विधाने करून चर्चेत आले आहेत. आता त्यांनी सपा आणि बसपा पक्षावर निशाणा साधला.
उत्तर प्रदेशमधील पिलीभितमध्ये एका प्रचार सभेत वरूण गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. सपा आणि बसपाचे महागठबंधन पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करत आहे. त्यामुळे पाकिस्तानऐवजी भारतमातेसाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी मतदारांने केले.
वरुण गांधी म्हणाले की, तुम्ही भारतासोबत आहात की पाकिस्तानसोबत, असा प्रश्न करून तुम्ही महागठबंधनला मतदान करणार असाल, तर ती सर्व मंडळी पाकिस्तानची आहेत. यात काही चुकीचे आहे का? असा सवाल केला.
अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली, त्यावेळी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यांनी राम भक्तांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यात ५०० लोकांचा बळी गेला होता. मुलायम सिंग यांचे हात रक्ताने माखलेले आहेत, हे आम्ही विसरू शकत नाही, असे वरुण गांधी म्हणाले.