शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश न देणे चुकीचे – अरविंद केजरीवाल

0
724

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – आपल्या मागण्यांसाठी दिल्ली सीमारेषेवर पोहोचलेल्या ‘किसान क्रांती यात्रे’वर पोलिसांकडून बळाचा वापर केला जात आहे. हरिद्वारमधून निघालेली पदयात्रा दिल्लीच्या वेशीवर पोहोचली असून त्यांना दिल्लीत प्रवेश मिळू नये यासाठी दिल्ली – उत्तर प्रदेश सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.

‘शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला पाहिजे. त्यांना दिल्लीत प्रवेश का दिला जात नाही आहे ? हे चुकीचे आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत’, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.  स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आणि अन्य मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीकडे निघाला असून दिल्ली- उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोलिसांनी किसान यात्रा रोखली आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या असून शेतकऱ्यांवर बळाचा वापर करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी रोखण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिल्लीत १४४ जमावबंदी कलम लागू करण्यात आली होती.

मोर्चात जवळपास ३० हजार शेतकरी सहभागी झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कर्जमाफी तसेच कमी पैशात वीज उपलब्ध करुन देण्यासहित शेतकऱ्यांच्या एकूण २१ मागण्या आहेत. २३ सप्टेंबरला हरिद्धारमधून पदयात्रेला सुरुवात झाली होती. सोमवारी १ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा विस्कटल्यानंतर शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात राहणाऱ्या रमेश यादव, जे हरिद्धवारपासून पदयात्रेत सहभागी आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. कधीपर्यंत ते अशाच प्रकारे पदयात्रा काढत राहणार आहेत? स्वामीनाथन अहवाल लागू करण्याचा आमची मागणी आहे. देशभरात पेट्रोल, डिझेल आणि वीजेचा दर वाढत असल्याने शेतकरी हतबल आहेत. सरकारने तर १० वर्ष जुने ट्रॅक्टर शेतात नेले जाऊ शकत नाहीत असा आदेश जारी केला आहे. आम्ही नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणणार? अनेक शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे हाल होत आहेत’.