शिवसेनेशिवाय भाजपाचे सरकार टिकणार नाही – जयंत पाटील

0
503

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – शिवसेनेशिवाय राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होऊ शकत नाही. तसेच शिवसेनेशिवाय राज्यात सरकार स्थापन झाले तर ते टिकणार नाही, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. शिवसेना भाजपाच्या अंतर्गत चर्चा काय आहेत, याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही, असेही ते म्हणाले.

भाजपाने काही आमदारांना आमदारांना आमिष दाखवण्यास सुरूवात केली आहे, असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला. तसेच कोणत्याही पक्षाचा आमदार जर फुटला तर त्याच्याविरोधात सर्व पक्ष एकत्र येतील आणि त्याचा पराभव करतील, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या आमदारांना जायचे होते ते यापूर्वी गेले आहेत. सध्या नव्याने निवडून आलेले आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेले चेहरे राष्ट्रवादीकडे आहेत. तसेच विरोधातच बसण्याची आमची मानसिकता आहे, पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेशी कोणतीही चर्चा झाली नाही. शिवसेना भाजपाने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे, असे पाटील म्हणाले. राष्ट्रपती राजवटीकडे जाण्याचे प्रश्न सध्या उद्भवत नाही. भाजपाने एकंदरीत परिस्थिती पाहून पुढचे पाऊल टाकले पाहिजे. शिवसेनेने समान वाटा मागितला आहे तो त्यांना दिला तर राष्ट्रपती राजवटीचा प्रश्नच येणार नाही. परंतु भाजपाने जे त्यांना देण्याचे मान्य केले आहे, ते का दिले जात नाही, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असल्याचे ते म्हणाले.