मुंबई, दि. १७ (पीसीबी) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाई (आठवले) गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केले आहे. रामदास आठवले यांनी यावेळी रिपांई आणि शिवसेनेच्या युतीच्या आठवणी जागवल्या आहेत. शिवसेना,भाजप आणि रिंपाईची युती तुटल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. भविष्यात तिन्ही पक्षांनी एकत्र येत पुन्हा एकजूट करणं ही बाळासाहेब ठाकरेंना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना आठवलेंनी व्यक्त केली.
रामदास आठवले यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. “शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन! त्यांच्या स्वप्नातील शिवशक्ती भीमशक्ती भाजप एकजूट आम्ही साकारली. पण, नंतरच्या काळात ती तुटली त्याची खंत वाटते.भविष्यात पुन्हा ती एकजूट उभारावी हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल!”, असं ट्विट रामदास आठवले यांनी केलं आहे.