शहरांमध्ये शहरी नक्षलवादात वेगाने वाढ. सरकारने शहरी नक्षलवाद्यांवर त्वरीत कारवाई करावी

0
318

गडचिरोली, दि.१९ (पीसीबी) : राज्यातील बड्या शहरांमध्ये शहरी नक्षलवाद वेगाने पसरत आहे. त्यामुळे सरकारने शहरी नक्षलवाद्यांवर त्वरीत कारवाई करावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार हे गडचिरोलीत आले होते. यावेळी त्यांनी सरकारला ही सूचना केली. नक्षलवाद विरोधी कारवाईत पूर्वीपेक्षा अधिक सुधारणा झाली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अजूनही शहरी नक्षलवाद आहे. नागपूर ते पुण्यापर्यंत शहरी नक्षलवाद पसरत आहे. त्यामुळे आताच काळजी घेणं गरजेचं आहे. या प्रकारावर त्वरीत कारवाई केली नाही तर समस्या निर्माण होऊ शकते, असं पवार यांनी सांगितलं.

गडचिरोलीतील सुरजागड खाणीत 10 हजार स्थानिक लोकांना रोजगार मिळाला. नव्या पिढीचं फ्रस्टेशन घालवायचं असेल तर रोजगार निर्मिती करणे गरजेची आहे, असंही त्यांनी सांगितलं. शहरी नक्षलवाद पुणे, मुंबईतही आहे. केरळातही हे लोक आहेत. हा वर्ग समाजात असून सरकारच्या विरोधात द्वेष पसरविण्याचं काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. तसेच राष्ट्रवादीकडे गृहखाते आहे. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शनिवारी गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली होती. या चकमकीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यात मोठी बक्षिसांची रक्कम लावलेल्या नक्षलवाद्यांचाही समावेश होता. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पवारांनी गडचिरोलीचा दौरा केला. यावेळी त्यांनी आदिवासी तरुणांशी संवाद साधत त्यांना मुख्यप्रवाहात येण्याचं आवाहन केलं.

दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी पवार नाशिकमध्ये होते. त्यावेळी त्यांनी नक्षली कारवायांवर भाष्य केलं होतं. नक्षलवादाचा ट्रेंड महाराष्ट्रात वाढत आहे असं नाही. ज्यांनी खरोखरच नक्षलवादी विचार स्वीकारले ते वेगळे आहेत. असा वर्ग फक्त महाराष्ट्रात आहे असं नाही. आदिवासींवर अन्याय झाला आणि त्यांनी आंदोलन केलं की त्यांना नक्षलवादी ठरवता. यावर बॅलन्स ठेवायला हवा. माझ्या दृष्टीने हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. सोशित लोकांना मुख्य प्रवाहात आणून बदल घडेल. पोलीस बळाचा वापर करून हा प्रश्न सुटेल असं म्हणणं असत्य आहे. तिकडे विकास करायला हवा. तिथल्या लोकांना संधी द्यायला हवी, असंही त्यांनी सांगितलं होतं.