विनाकारण मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

0
408

हिंजवडी, दि. ३ (पीसीबी) – कार मधून पत्नी आणि बहिणीसोबत जात असलेल्या व्यक्तीला तिघांनी मिळून अडवून मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या जखमी व्यक्तीच्या पत्नी आणि बहिणीला शिवीगाळ केली. ही घटना बुधवारी (दि. 1) दुपारी पाच वाजता मुंबई-बेंगलोर महामार्गावर, ओर्चीड हॉटेल जवळ घडली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल गुनवरे (रा. बारामती), शिवाजी जाधव (रा. बारामती) आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आनंदराव रामचंद्र घोरपडे (वय 35, रा. वेताळबुवा चौक, न-हे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी, त्यांची पत्नी आणि बहीण असे तिघेजण त्यांच्या कारमधून जात होते. मुंबई-बेंगलोर महामार्गावर ओर्चीड हॉटेल जवळ आल्यानंतर आरोपींनी त्यांची कार फिर्यादी यांच्या कारला आडवी लावली. काहीही न बोलता आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. फिर्यादी यांची पत्नी आणि बहीण हे भांडण सोडविण्यासाठी आल्या असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली. फिर्यादी यांना लोखंडी दांडक्याने मारून दुखापत केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.