नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतील सहाव्या आणि सातव्या टप्प्यांतील ११८ जागांसाठीचे मतदान शिल्लक असताना, ‘भाजप स्वबळावर तीनशे जागा जिंकणार’ अशी आवई दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उठली आहे. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट नव्हे तर त्सुनामी आली असून २३ मे रोजी पूर्वीपेक्षा जास्त संख्याबळाने सत्तेत परतणाऱ्या भाजपपुढे विरोधी पक्षांची वाताहत होणार आहे, असा विश्वास भाजपचे नेते व्यक्त करीत आहेत. भाजपमध्ये अकस्मात निर्माण झालेल्या या आत्मविश्वासामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या असून, ते सावध झाले आहेत.