राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वावरील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

0
430

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरूवार) फेटाळून लावली आहे. यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमेठीतील एका अपक्ष उमेदवाराने राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा  उपस्थित करून याचिका दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

दरम्यान, बॅकॉप्स लिमिटेड या ब्रिटिश कंपनीच्या २००३ मधील नोंदीत राहुल गांधी हे संचालक असल्याचे म्हटले आहे. त्यात त्यांचे नागरिकत्व ब्रिटिश असल्याचे दिसून येते, असा आरोप करण्यात आला होता. यावरून त्यांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना अडचणीत आणण्यासाठी याचिका दाखल केली होती.

दरम्यान, भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत गृहमंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती.  त्यानंतर गृहमंत्रालयाने देखील राहुल गांधी यांना नोटीस बजावून १५ दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दिले होते.