”राज्य सरकारचे मंत्री बलात्काऱ्यांना पाठिशी घालतात, हे शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही”

0
345

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : “स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड सध्या राजकारणात आला आहे. मात्र संजय राठोड हा पूजा चव्हाणचा हत्यारा आहे, त्याच्या मुसक्या आवळायलाच हव्यात, असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. गुन्हेगाराला जात-पात नसते. महाविकास आघाडीचे नेते म्हणत होते संजय राठोड आमच्या संपर्कात आहे. मात्र संजय राठोडांनी मंत्र्यांशी संपर्क करण्याऐवजी पोलिसांशी संपर्का का केला नाही? असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.

चित्रा वाघ म्हणाल्या, “मी निर्दोष आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राठोड यांनी केला. संजय राठोड त्यांनी केलेल्या पापाची कबुली करण्यासाठी ते बंजारा समाजाच्या काशीमध्ये गेले. समाजाला एकत्रित करुन घोषणाबाजी केली गेली. दोन फरार मुलांपैकी एका मुलाचा सुगावा लागला. संजय राठोडांचा शहाणपणा गेले पंधरा दिवस कुठे होता. दोन पैकी एक मुलगा फरार आहे. एक मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे. बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळ्या मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. संजय राठोडांच्या मुसक्या सरकारनं आवळायला हव्या, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

राज्य सरकारचे मंत्री बलात्काऱ्यांना पाठिशी घालतात, हे शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली. पुणे पोलिसांकडून राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाखल केलेला अहवाल ही महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात केलेली धुळफेक आहे. बंजारा समाजाबद्दल आदर आहे. आपण शेण खायचं आणि समाजाला वेठीस धरायचं, हे योग्य नाही. संजय राठोड हा पूजा चव्हाणांचा हत्यारा आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. राजकारणासाठी समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेंड राजकारणात येत आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.