मुंबई, दि.४ (पीसीबी) – राज्यात भाजपाचे नाही तर शिवसेनेचेच सरकार येणार असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. भाजपाने शिवसेनेचे आमदार फोडले तर पोटनिवडणुकीत आम्ही पाठिंबा देऊ आणि शिवसेनेचे आमदार पुन्हा निवडून आणू असंही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आता जयंत पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, या निकालात भाजपाचे १०५, शिवसेनेचे ५६, काँग्रेसचे ४४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले. आता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल आणि १४५ ची मॅजिक फिगर गाठायची असेल तर शिवसेनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देऊ शकतात. याच सगळ्याबाबत प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी राज्यात भाजपाचे नाही तर शिवसेनेचे सरकार येईल असे म्हटले आहे. शिवसेनेतर्फे संजय राऊत यांनी रविवारी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी आम्ही १७० चा आकडा बहुमत सिद्ध करण्यासाठी गाठू शकतो असे म्हटले होते. आता या सगळ्याबाबत भाजपा काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.