राज्यात नवीन रेकोर्ड, आतापर्यंत ६५ लाख ५५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – छगन भुजबळ

0
401

 

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात कोरोनाच्या काळात किती धान्यवाटप झाले याची माहिती दिली. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ ते २६ एप्रिल २०२० या सव्वीस दिवसात राज्यातील १ कोटी ५३ लाख ६४ हजार ७६९ शिधापत्रिकाधारकांना तब्बल ६५ लाख ५५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे २० लाख २८ हजार ६१६ क्विंटल गहू, १५ लाख ६७ हजार १२१ क्विंटल तांदूळ, तर १९ हजार ३०५ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ८ लाख ३२ हजार ७३९ शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

राज्य शासनाने कोविड-19 च्या संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ०८ लाख ४४ हजार ०७६ APL केशरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.२४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन २८ हजार ०९० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.