”राजा इतना भी फकीर मत चुनो की…”

0
371

नवी दिल्ली, दि. 23 (पीसीबी) : दिल्लीत काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकरी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम असून, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मोदी सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. सध्या देशाचं लक्ष लागलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. नव्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. तिन्ही कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकार व भाजपाकडून तिन्ही कायद्यांचे फायदे शेतकऱ्यांना पटवून दिले जात आहेत. अनेक कार्यक्रम भाजपाकडून घेतले जात आहेत.

देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या आंदोलनासंदर्भात नवज्योत सिंह सिद्धू यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमधून सिद्धूने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “राजा इतना भी फकीर मत चुनो की कोई भी व्यापारी उसे अपनी जेब में रख लेI,” असं म्हणत सिद्धू यांनी मोदींना टोला लगावला आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांनी हे वाक्य दुसऱ्यांदा ट्विट केलं आहे. यापूर्वी २०१९मध्येही त्यांनी हे वाक्य ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी पुन्हा शेतकरी संघटनांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी केंद्राला प्रतिसाद दिलेला नाही. केंद्राशी बोलणी करून काही निष्पन्न होत नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. केंद्राच्या निमंत्रणावर बुधवारी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.