नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणारी जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. भारतरत्न कोणाला द्यायचा हे आता न्यायालय ठरवणार का, असा सवाल प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठाने उपस्थित केला.
ही कोणत्या प्रकारची याचिका आहे? खंडपीठाने याचिकाकर्ते राकेश कुमार यांचे वकील अरविंद कुमार दुबे यांना एकतर याचिका मागे घेण्यास सांगितले, अन्यथा न्यायालय दंड ठोठावून ती फेटाळून लावेल. कोर्टाची बाजू मांडत वकिलांनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. त्यावर खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.