‘….म्हणून त्या दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांना निलंबित करण्यात आलं’

0
285

जालना, दि.१५ (पीसीसीबी) : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची कोणत्याही परवानगी शिवाय झाडाझडती केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलिसांचं वर्तन बेकायदेशीर आणि बेशिस्तपणाचं असल्याचा आरोप करत दोन फौजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं आहे. याप्रकरणी रावसाहेब दानवे यांनी तक्रार दिली होती. पोलीस अधीक्षकांनी एकाच वेळी 5 पोलिसांना तडकाफडकी निलंबित केल्याने राज्य पोलीस दलात एकच गोंधळ उडाला आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे, पोलीस हवालदार मंगलसिंग रायसिंग सोळंके, पोलीस कर्मचारी सचिन उत्तमराव तिडके आणि पोलीस कर्मचारी शाबान जलाल तडवी अशी निलंबित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नावं आहेत.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, दि. 11 जूनला कोणतीही परवानगी न घेता संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यलयाची तपासणी केली. यावेळी पोलिसांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत कामकाजाची कागदपत्रे देखील सोबत नेली. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणाची चौकशी करून दोन पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जणांचं निलंबन केलं. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी केलेल्या तपासणीत नेमकं काय निष्पन्न झालं याचा खुलासा मागितला आहे. भाजपच्या बड्या नेत्याच्या कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी केल्यामुळे 2 पोलीस उपनिरीक्षक आणि 3 पोलिसांना निलंबित करण्यात आल्यानंतर घडलेला प्रकार नेमका काय होता. हे समजण्यास आणखी काही गोष्टींचा खुलासा होणे गरजेचे आहे असे काही जण सांगत आहेत.