मुंबई, दि. ११ (पीसीबी) – कोण कुणावर काय बोलतो, आपण जे बोलतो ते लोकांना पचेल, तरी काय याचे भान नाही. यांना ठाणे-मुंबईच्या वादात बोलवले जात नाही आणि हे भारत-पाक सीमेवर बोलतात. मोदींवर बोलण्याची तुमची औकात नाही. तेव्हाही मोदींच्या मागे लपून मते घेतली. तुमच्या टीकेला भीक घालत नाही, अशा शब्दांत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
मुंबईत आयोजित महिला मेळाव्यात शेलार बोलत होते. राज ठाकरे यांनी मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला होता. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक यावरून राज यांनी मोदींच्यावर टीकेची झोड उठवली होती. याचा शेलार यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
दरम्यान, राज ठाकरे सुपारी घेऊन भाषण करतात. त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीमधून येते. ज्यांना नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणता येते नाही, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.