मुलीच्या कन्यादानानंतर शेतकरी पित्याची आत्महत्या

0
893

यवतमाळ, दि.३१ (पीसीबी) – मुलीचे कन्यादान केल्यानंतर कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडलीबंडू उद्धवराव कांबळे (वय ५५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

नेर तालुक्यातील पांढरी (शिरजगाव) येथे राहणारे बंडू कांबळे आपल्या दोन भावांसह वडिलोपार्जित आठ एकर जागेवर शेती करत होते. त्यांच्यावर शेतीसाठी घेतलेले मोठे कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे कर्जाचा हा डोंगर वाढत गेला. उसनवारी करून त्यांनी मुलीचे लग्न करून दिले. रविवारी त्यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला. मंगळवारी सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर त्यांनी नववधू मुलगी व जावयास निरोप दिला.  घरात पाहुणे मंडळी झोपली असताना रात्रीच्या वेळी घरातीलच एका खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. त्यांना आणखी एक मुलगी व मुलगा आहे.

दरम्यान, २०१४ पूर्वी विदर्भातील शेतकरी आत्महत्यांवरुन भाजपाने तत्कालीन सरकारवर टीकेची झोड उठवली होती. पण गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपा सरकारच्या कालावधीत विदर्भातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांभोवती असलेला आत्महत्येचा फास अद्यापही कायम आहे. जून २०१४ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये तब्बल पाच हजार ६८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.