मुख्यमंत्र्यांच्या दिर्घायुष्यासाठी पायी तिरूपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू

0
341

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मुख्यमंत्र्यांच्या दिर्घायुष्यासाठी पायी तिरूपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू झाला आहे. शिवसैनिक सुमंत रूईकर हे उद्दव ठाकरेंना दिर्घायुष्य लाभावे यासाठी पायी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला निघाले होते. त्यांनी यासाठी 1100 किलोमीटर पायी चालण्याचा निश्चय केला होता. पण ते तिरूपती बालाजीला पोहोचण्याआधीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

सुमंत रुईकर हे त्यांच्या मित्रासोबत तिरूपती बालाजी निघाले होते. रोज 35 किलोमीटर चालून हा प्रवास करण्याचा त्यांचा विचार होता. 31 डिसेंबरला त्यांना बालाजीला पोहोचायचं होतं. शनिवारी ते कडप्पापर्यंत पोहोचले होते. पण चालून चालून ते खूप दमले होते. त्यावेळी त्यांच्या मित्रानी रुईकरांच्या घरी कळवलं. त्यामुळे घरच्यांनी त्यांना माघारी येण्याची विनंती केली होती.

रूईकर हे माघारी जाण्यासाठी तयार नव्हते. शेवटी खूप समजावून सांगितल्यानंतर रूईकर माघारी येण्यासाठी तयार झाले. ते कडप्पामधून रेल्वेत बसले होते. मात्र सोलापूर येण्याआधीच ते तेलंगणातील रायचूर स्टेशनवर उतरले आणि पुन्हा एकटेच तिरूपतीकडे निघाले. अंगात ताप असल्याने आणि शरीरात कसलाच त्राण न उरल्याने त्यांचा रायपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, रूईकर यांनी यापूर्वीही एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी तिरूपती बालाजीची पायी यात्रा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार देखील केला होता. रुईकर यांनी तिरूपती बालाजीला जातानाचा फेसबूक व्हिडीओदेखील शेअर केला होता.