मुंबई तुंबली! जोरदार पावसानं मुंबई लोकल’ला पुन्हा ब्रेक; रेल्वे रूळ पाण्याखाली

0
329

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोरदार सलामी दिली. मागील काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोळसत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. तर पहिल्या पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लावला. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवा थांबवण्यात आली आहे.

केरळातून पुढे सरकलेला मान्सून वायूवेगानं आधी महाराष्ट्रात तर आज एक दिवस आधी मुंबईत दाखल झाला. यापार्श्वभूमीवर बुधवारीपासून पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. हवामान खात्याचा अंदाजावर पावसाने शिक्कामोर्तब केलं. मुंबई आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली. अद्यापही अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने दमदार पाऊस कोसळत आहे. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला असून, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.

पहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी स्थानकावरील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला अशी मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. संततधार पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १० वाजेच्या सुमारास अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.