Home Maharashtra महाराष्ट्रात ३६५ दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे – राज ठाकरे
मुंबई, दि.१२ (पीसीबी) – तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी राज ठाकरे यांचे बुधवारी औरंगाबादेत आगमन झाले. आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवजयंती साजरी केली. महाराष्ट्रात ३६५ दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार या वादावर बोलताना राज ठाकरेंनी सांगितले की, “मी काही वर्षांपूर्वी जयंत साळगावकर यांच्याकडे गेलो होतो. त्यांना मी तेव्हा शिवजयंती तारखेनुसा साजरी करायची की तिथीनुसार असे विचारले होते. यावर त्यांनी सांगितलं की, ३६५ दिवस करायची. पण तिथीनुसार का याबद्दल सांगायचे झाले तर, आपण जे वर्षभर सण साजरे करतो ते तिथीनुसार करतो. कोणताच सण तारखेनुसार साजरा केला जात नाही. महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे. त्यामुळे तो एका सणाप्रमाणेच साजरा झाला पाहिजे”.
शिवजयंती साजरी होत असताना गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले. करोनासंबंधी बोलताना राज ठाकरेंनी आधीच या देशात रोगराई आहे त्यात अजून एक वाढला तर काय फरक पडतो असे म्हटले. काळजी घेतली पाहिजे यात काही वाद नाही. महाराष्ट्रात कोणाला लागण होता कामा नये अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.