महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; ब्रिटनमध्ये आढळला कोरोना व्हायरसचा नवा प्रकार

0
423

मुंबई, दि.२१(पीसीबी) : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महानरपालिका क्षेत्रात हि संचारबंदी लागू असणार आहे. २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालवाधीत ही संचारबंदी लागू असणार आहे. ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांची एक तातडीची बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून ब्रिटनमध्ये जे वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाइन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) करणे बंधनकारक केले आहे. त्यांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.