“महाराष्ट्रातील भाजपा सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांनाही जुमानत नाही”

0
310

मुंबई,दि.१६(पीसीबी) – सुप्रीम कोर्टापासून पंतप्रधान मोदीपर्यंत सगळ्यांचेच म्हणणे आहे की, निर्बंध पाळा. तिसऱ्या लाटेपासून सावध राहा, पण महाराष्ट्र भाजपचे राजकारण दुसऱ्या टोकाचे. ते सुप्रीम कोर्ट व पंतप्रधानांनाही जुमानत नाही असे दिसते अशी टीका शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. गंगेच्या प्रवाहात श्रद्धाळूंचे मृतदेह वाहातच राहावेत, हीच त्यांची भावना असेल तर गंगामय्याचा कोप अशा लोकांवर झाल्याशिवाय राहाणार नाही असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

“करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही ‘कावड यात्रे’ला योगी आदित्यनाथ यांनी परवानगी दिली. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला झापले आहे. कावड यात्रा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे हे मान्य, पण कुंभमेळ्यापासून कावड यात्रेपर्यंत गर्दीचा पूर येतो, त्या पुरात शेवटी भक्तांचीच प्रेते वाहताना दिसतात. उत्तराखंड सरकारने कोरोना काळात कावड यात्रेवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. दोन्ही भाजपशासित राज्ये असून दोघांच्या दोन तऱहा दिसत आहेत. पण उत्तर प्रदेशातील कावड यात्रेची दखल घेऊन शेवटी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला हे महत्त्वाचे. महाराष्ट्रातील भाजप पुढारी यातून काही शिकणार आहेत काय? पंढरपूरच्या वारीस परवानगी द्या, असे एक टुमणे ते लावत आहेत व वारकरी संप्र्रदायातील काही जाणत्या मंडळींना भरीस घालून ‘वारी’साठी आंदोलने घडवीत आहेत. लोकांच्या जिवाशी खेळण्याचेच हे अघोरी प्रकार आहेत,” असा आरोप शिवसेनेने केला आहे.

“महाराष्ट्र सरकारने श्रद्धा व भावनेच्या आहारी जाऊन माऊलीच्या वारीस परवानगी दिली असती तरी सुप्रीम कोर्टाने त्या निर्णयात हस्तक्षेप केलाच असता, हे उत्तर प्रदेशातील घटनेवरून स्पष्ट दिसते. पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या तिसऱया लाटेसंदर्भात लोकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयास हे वारंवार सांगावे लागत आहे. पंतप्रधान बोलत आहेत, तरीही महाराष्ट्रातील भाजप पुढाऱयांच्या डोक्यातील बटाटय़ांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचे आश्चर्य वाटते,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

“पंढरपूरची वारी हा जसा श्रद्धेचा विषय तसे उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये कावड यात्रेचे महत्त्व आहे. आता त्याच श्रद्धांचा मान ठेवून भाजपचे लोक ‘कावड यात्रेला परवानगी द्या, नाहीतर आंदोलन करू,’ अशा धमक्या देणार आहेत काय? ही धमकी एकतर सुप्रीम कोर्टाला असेल नाहीतर थेट पंतप्रधान मोदींनाच असेल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला हा त्यांचा अनुभव आणि शहाणपणच आहे. मग धामी हे हिंदूविरोधी आहेत असा ठपका ठेवून धामींना हाकला अशी मागणी कोणी करणार आहेत काय?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

“कावड यात्रा पवित्र गंगा आणि गंगाजलाशी संबंधित आहे. हजारो श्रद्धाळू या काळात ‘कावडी’ घेऊन हरिद्वारला येतात व गंगाजल भरून आपापल्या गावातील मंदिरात नेतात. ‘कावड यात्रा’ ही हजारो वर्षांची धार्मिक परंपरा आहे. हिंदूंच्या भावना त्यात गुंतल्या आहेत हे खरे, पण सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचे निर्बंध तोडून हरिद्वारला गर्दी केली तर गंगामाता कोपल्याशिवाय राहणार नाही,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“याच गंगेने हजारो कोरोनाग्रस्तांची प्रेते पोटात घेऊन अश्रू ढाळले आहेत. दुसऱया लाटेच्या तडाख्याने समाज हादरून गेला. तिसऱया लाटेने तो पूर्ण उद्ध्वस्त होऊन कोलमडून पडू नये,” असं मत शिवसेनेने व्यक्त केलं आहे.