तामलुक, दि. ६ (पीसीबी) – पश्चिम बंगालच्या स्पीड ब्रेकर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फनी वादळावरूनही राजकारण केले आहे. या वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी त्यांना दोनदा फोन केला. पण त्यांनी फोन उचलला नाही, असा हल्ला पंतप्रधान मोदी यांनी चढवला.
पश्चिम बंगाल येथील तामलुकमध्ये प्रचारसभेत मोदी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळाच्या निमित्ताने भरपूर राजकारण करण्याचा प्रयत्न केला. वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मी त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन घेतला नाही. त्यांच्या फोनचीही मी वाट पाहत राहिलो. पण त्यांनी समोरूनही फोन केला नाही. त्यामुळे मी त्यांना पुन्हा फोन लावला. तरीही त्यांनी फोन घेतला नाही. त्यावरून दीदींना जनतेपेक्षा राजकारण करण्यात मोठा रस आहे, असा टोला मोदींनी लगावला.
‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने ममता बॅनर्जी भडकल्या होत्या, त्यावरूनही मोदींनी ममतांवर टीका केली. दीदी भयभीत झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रभू रामचंद्राचे नाव घेतले तरी अडचण होते. ‘जय श्रीराम’ म्हणणाऱ्यांना दीदी तुरुंगात टाकत आहेत, अशी सध्याची परिस्थिती आहे, असेही मोदी म्हणाले.