मुंबई, दि. १३ (पीसीबी) – दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केले ते सांगावे. दुष्काळाची कामे केली, तर मग दुष्काळ जाहीर का करावा लागला, असे प्रश्न उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली. दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे, तर मग तो खर्च का करत नाही, असाही प्रश्न त्यांनी यावेळी केला.
राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. दुष्काळाचा भीषण प्रश्न का निर्माण झाला? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या असे प्रश्न राज ठाकरेंनी केले. पंतप्रधान मोदी यांनी एअर स्ट्राईकबाबत जे वक्तव्य केले आहे. त्यावरून देशाची खिल्ली उडवली जात आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला होता, असे मोदींनी म्हटले होते. या वक्तव्यावरून जगभरात आपली खिल्ली उडवली जात आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.