नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानाचा कांगावा सुरूच आहे. भारतीय पाणबुडीने पाकिस्तानच्या जलक्षेत्रात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केला. हा प्रयत्न पाकिस्तानने हाणून पाडला, असा दावा पाकिस्तानच्या नौदलाने आज (मंगळवार) केला आहे.
याबाबत पाकने मीडियाला एक फुटेजही दिले आहे. हा दावा आणि फुटेजही फुसका बार आहे. भारतीय संरक्षण तज्ज्ञांच्या मते हा दावा पोकळ आहे. पाकिस्तानला असे करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे म्हटले आहे.
ज्या क्षेत्राला पाकिस्तान आपली सीमा म्हणत आहे, तो भाग आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रात येतो. आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्र असल्याने तेथे पाकिस्तानला भारतीय पाणबुडी ताब्यात घेण्याचा किंवा सोडण्याचा अधिकार नाही.
पाकिस्तानच्या शांततेच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने या पाणबुडीला लक्ष्य केले नाही, असाही पाकिस्तानचा दावा आहे. तसेच भारताने २०१६ नंतर दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या जलक्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, असे पाकने म्हटले आहे.