बीड, दि. १३ (पीसीबी) – भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा दंगली घडवण्याचा इतिहास आहे. भाजप सरकार दंगली घडवणारे सरकार आहे, या सरकारला जनतेच्या हिताचे काहीही चिंता नाही, असा घणाघात भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. बीडमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने आयोजित केलेल्या सत्ता निर्धार सभेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, दंगली घडवणारे सरकार असून या सरकारला देशातील जनतेची चिंता नाही. दुष्काळामुळे सध्या राज्यात गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. तरीही सरकारकडून दुष्काळग्रस्त भागात कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे सरकारला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले. भाजप सरकारने भ्रष्टाचाराच्या नावावर ४१ योजना बंद केल्या आहेत. आजार बरा करण्यापेक्षा त्या आजारी व्यक्तीला फाशी देणारे हे सरकार आहे, असेही ते म्हणाले.
मोदींनी नोटबंदी करून मोठ्या प्रमाणात पैसा जमावला आहे. तोच पैसा जनतेची मते विकत घेण्यासाठी आता वापरला जाणार आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. नोटाबंदीमुळे ५ कोटींहून अधिक नागरिकांचा रोजगार गेला आहे. आगामी निवडणुकीत देशात शांतता आणि संविधानाच्या रक्षणासाठी वंचित विकास आघाडीला निवडून देण्याचे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.