भाजप विचारधारेचा पक्ष; मोदी शहांचा कधीच होणार नाही – नितीन गडकरी

0
395

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – भाजप हा मोदीकेंद्रित पक्ष असल्याचा आरोप फेटाळत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, आमचा पक्ष कधीच व्यक्तिकेंद्रित होणार नाही, असे सांगितले.

भाजप वाजपेयी किंवा अडवाणींचा पक्ष झाला नाही. तसेच तो केवळ अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांचा पक्ष होणार नाही. भाजप कधीच व्यक्तिकेंद्रीत नव्हता आणि होणारही नाही. कारण तो विचारधारेवर आधारलेला आहे. तो तसा होईल, ही चुकीची कल्पना आहे, असे गडकरी यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. भाजप आणि मोदी किंवा भाजप आणि पक्षाचे नेते हे परस्परांना पूरक आहेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही, असे अनेकांनी केलेले भाकीत गडकरी यांनी फेटाळले. ते म्हणाले, गेल्या वेळेपेक्षा भाजपला जास्त जागा मिळतील. पक्ष मजबूत असेल, परंतु त्याचे नेते कमकुवत असतील आणि नेते मजबूत असतील परंतु पक्ष कमकुवत असेल तर निवडणुका जिंकता येत नाहीत. पण, लोकप्रिय नेते स्वाभाविकपणे पुढे येतात, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.