नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला होता. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर देशात आर्थिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात रस्त्यावर छोटी दुकाने, ठेला चालवणारे तसेच फेरीवाले, पथारीवाले यांचाही सर्वेक्षणात समावेश करण्यात येणार आहे. २७ कोटी घरात आणि ७ कोटी आस्थापनात हे आर्थिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
जनगणनेप्रमाणेच मोठ्या प्रमाणात देशात प्रथमच आर्थिक सर्वेक्षण केले जाणार आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यात हे आर्थिक सर्वेक्षण केले जाणार आहे. देशात किती रोजगार आहेत, किती बेरोजगार आहेत, हे याची सहा महिन्यात पडताळणी करण्याचा सरकारचा विचार आहे.
बेरोजगारीच्या मुद्द्यांवर मोदी सरकारवर विरोधकांनी टीका केली होती. मोदी सरकारने असंघटीत क्षेत्रात रोजगार निर्मितीचा दावा केला होता. पण मोदी सरकारकडे याचा आकडा नव्हता. त्यामुळे आता विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.