पुणे, दि. १५ (पीसीबी) – दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बेधडक होते, आपले मत ते स्पष्टपणे मांडत असे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निमित्ताने पवारांनी बाळासाहेबांच्या आठवणींना ट्विट करून उजाळा दिला आहे.
ठाकरे चित्रपटांमुळे बाळासाहेबांच्या मराठी अस्मितेच्या धगधगत्या अंगाराच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे, असे पवार यांनी म्हटले आहे. साध्या कार्यकर्त्यालासुद्धा सोबत घेऊन त्याला मोठे करण्याचे स्वप्न पाहणारे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या शिवाजी पार्कातील पहिल्याच सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद अजूनही डोळ्यांसमोर तरळत आहे, असे पवारांनी म्हटले आहे.
सीमाभागातील आंदोलनाचा उल्लेख करून एक आठवण सांगताना पवार म्हणाले की, सीमाभागात मराठी बांधवांवर झालेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी ठाकरे यांनी मला लक्ष घालण्यास सांगितले होते. त्यावेळी मला आंदोलनादरम्यान दुखापत झाली होती. याबाबत समजताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते, असे पवार यांनी सांगितले.